मुंबई : मुंबई आणि रायगडसह कोकण किनारपट्टीच्या इतर भागांत लवकरच सागरी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. किनारपट्टीच्या भागांतील नागरिकांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी ही सुविधा असेल. यापूर्वी देशात नर्मदा नदीवर तरंगता दवाखाना सुरू करण्यात आला होता. त्यात डॉक्टर, रुग्णसेविका, मदतनीस, चालक व इतर कर्मचारी उपलब्ध आहेत.
काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी नागरिकांवरील उपचारांसंदर्भात नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर, ‘किनारपट्टीच्या भागांतील नागरिकांना उपचारांसाठी मुंबईत यावे लागते. हे लक्षात घेता प्रायोगिक तत्त्वावर ही उपाययोजना करण्यात आली आहे,’ असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
यानुसार मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया अशी सागरी रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी रायगड जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत ही सेवा सुरू करण्यात येईल. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. या रुग्णवाहिकेत प्रशिक्षित डॉक्टर, औषधे, मदतनीस, अत्याधुनिक उपकरणे, खलाशी असे कर्मचारी असतील. आजच्या घडीला राज्यात मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांतील काही सागरकिनाऱ्यांवर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहितीही डॉ. सावंत यांनी दिली.